Monday, November 3, 2014

तुका आकाशाएवढा


कार्तिकी एकादशीच्या आजच्या शुभदिनी या ब्लॉगची सुरुवात होत आहे, खुप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. राम कृष्ण हरी!

पहिला अभंग, जगप्रसिद्ध 'तुका आकाशाएवढा', पासुन सुरुवात करू :)

अणुरणीयां थोकडा | तुका आकाशाएवढा ||
गिळुनि सांडिले कळिवर | भव भ्रमाचा आकार ||
सांडिली त्रिपुटी | दीप उजळला घटी ||
तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता ||

तुकारामांचा हा अभंग म्हणजे त्यांच्या पूर्णत्वाची ग्वाहीच आहे. Enlightenment, ब्रम्हैक्यत्व किंवा जीवन्मुक्तता ही त्यांना प्राप्त झाल्यानंतरचा हा अभंग.

तुकाराम महाराज म्हणतात, 'तुका हा तसे पाहिले तर अणू-रेणुंहुनही छोटा आहे पण आता मात्र तो आकाशाएवढा झाला आहे.' अहं ब्रम्हास्मि या वेदोक्तीचा हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी विवरण केला आहे.
'देह किंवा कलेवर हे मी त्यागिले आहे कारण मी जाणतो की शरीर म्हणजे माया किंवा भवसागराचा  भाग आहे जो कि फक्त भ्रम आहे'. माझ्या मते याचे तात्पर्य कि, 'शरीर हे नाशवंत माया असल्याचे जाणून मी त्याचा विचार सोडला आहे.'
ज्ञात, ज्ञेय आणि ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, हा जो फरकाचा भास आहे तो पूर्णपणे विरून गेला आहे. आता ज्ञात, ज्ञेय आणि ज्ञान यांचे एकत्व आहे. हे असे होण्याचे कारण काय? तर आता मनात ज्ञानाचा दीप उजळला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, आता जीवन्मुक्तता लाभल्यानंतर, मी फक्त उपकारापुरताच उरलो आहे.

No comments:

Post a Comment