Saturday, June 6, 2015

संवसार तापे तापलो मी देवा



संवसार तापे तापलो मी देवा | करिता या सेवा कुटुंबाची ||
म्हणऊनी तुझे आठविले पाय | ये वो माझे माय पांडुरंगे ||
बहुता जन्मींचा जालो भारवाही | सुटिजे हे नाही वर्म ठावे ||
वेढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी | कणव न करी कोणी माझी ||
बहु पांगविलो बहु नागविलो | बहु दिवस जालो कासाविस ||
तुका म्हणे आता धाव घाल वेगी | ब्रीद तुझे जगी दीनानाथा ||

असे म्हणतात की जेव्हा आपण अगदी मनातुन, तळमळीने, जगाची कास पूर्णपणे सोडुन देवाला हाक मारू तेव्हा देव आपल्याला दर्शन देतो. जोपर्यंत आपण त्याला पूर्णपणे शरण जात नाही, तोपर्यंत दर्शन नाही.
हा तुकारामांचा अभंग हा देवाला तळमळीने हाक मारणारा अभंग आहे.
तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, या संसारात, आपल्या कुटुंबाची सेवा करता करता खूप कष्ट भोगलेत, संसाराच्या तापात मी तापलोय, होरपळून निघालोय. अाता मी खूप दुःखी आहे आणि मला तुझ्याच दयाळू चरणांची आठवण येत आहे. तू माझी माय आहेस, लेकराचे दुःख बघून क्ृपा करून ये.
कित्येक जन्मांपासून माझे आयुष्य असेच दुःखाचे कष्टाचेच आहे. कुटुंबाचा भार वाहतच कित्येक जन्म गेलेत. यातून कसे सुटावे याची मला कल्पना नाही. मला बाहेरून तसेच मनालाही चोरांनी (दुःखांनी? दुर्गुणांनी?) वेढलेले आहे आणि कोणालाही माझी करुणा येत नाही.
मी खूप वणवण फिरलोय, जनांमध्ये माझा खूप पानउतारा झाला आहे, खूप दिवसांपासून मी असाच कासाविस आहे. तुझ्या दीनानाथ या नावाचे ब्रीद आता तू खरे कर आणि माझ्यासाठी धावून ये.


No comments:

Post a Comment